Saturday 29 August 2020

टाळेबंदी आख्यान 

आपण सगळेच स्वानुभवातुन किंवा दुसऱ्यांचें अनुभव वाचून, बघून त्यातून काही घेण्यासारखं असेल तर नवीन काही तरी शिकत असतो आणि नसेल काही घेण्यासारखं तर मनोरंजन म्हणून गोड मानत असतो.

कोरोनामुळे आलेल्या  टाळेबंदीत घर"कोंबडा" झाल्यामुळे आलेल्या अनुभवाचे सर्वात मोठे संचित म्हणजे, घरी असल्यावर कधी आपले तोंड उघडावे (उचकटावे म्हणायचे होते पण असो) आणि कधी बंद ठेवावे यांचे इंगित उमजलं. जेणेकरून आपले साध्य (खाण्यापिण्याचे, भजी -वडे, चहाचे वगैरे) साध्य होतील. पुर्वी लोकांना अमोल पालेकरचे गाणे आठवायचे "गोलमाल है भाई सब गोलमाल है", आता मला आठवते "जपून जपून जपून जारे, पुढे धोका आहे". महाराष्ट्राची हास्यजत्रा बघण्याचा परिणाम असावा. 

अजून एका सत्याचा साक्षात्कार म्हणजे स्वयंपाकघर खरोखरच एक प्रयोगशाळा आहे. वेगवेगळे चविष्ट पदार्थांची भट्टी जमवण्यासाठी कारभारणीला करावे लागणारे प्रयोग बघणे जणु; विणाताईंचे "एक होता कार्व्हर" वाचण्यासारखे आहे. याचबरोबर घरी असल्यामुळे एकंदरीतच साफसफाई करावी असा अलिखित नियम असतो बहुतेक, कुठे काही कचरा, धुळ वगैरे दिसल्यास "तु तु मैं मैं" न करता मुकाट्याने झटकनी शोधावी. कारभारणीसोबत असाच स्वच्छतेचा प्रयोग करतां लक्ष्यात आले कि साधारण २०-२१ डब्बे (लहान, मध्यम आणि मोठे अशा आकाराचे) आणि ८-१० काचेच्या बरण्या आहेत. दर सहा महिन्यातुन एकदा हा स्वच्छतेचा प्रयोग करावा लागतो, मदत केली तर घरात होऊ शकण्याऱ्या शाब्दिण्विक (शाब्दिक +अण्विक) युद्धाचा धोका टळतो. 

अमेरिका - उत्तर कोरिया, भारत पाकिस्तान यांच्यातील अण्विक युद्धाचा धोका, जागतिक तापमान वाढीमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणाच्या समस्या यांसारख्या वैश्विक समस्यानंतर, मला सर्वात जास्त भेडसावणारी समस्या जर कोणती असेल तर ती म्हणजे, स्वयंपाकघरातील तेलकट -मळकट कि धुळकट अर्थात "तेलमिश्रित धुळमळकट" डब्बे आणि डब्ब्यांची झाकणे कमीतकमी कष्टात, दीर्घकाळ लखलखीत -चकचकीत कशी राहतील ही होय. :) या घरगुती स्वच्छता अभियानामुळे जी महागडी शिडी घेतली होती, तिचा पुरेपूर वापर झाल्यामुळे चुटपुट लागायची कमी झाली आणि घरातील कोपऱ्या कोपऱ्यामधे महाजाळीराज कोळीराज यांनी तयार केलेले फ्रॅक्चल (fractal) नक्षीकामाचे सौंदर्य बघून मी धन्य पावलो. 

लहान लहान गोष्टीत डोंगराएवढा आनंद असतो आणि तो हवा असेल तर घरातील लहान मुलाबरोबर लहान होऊन खेळले की तो गवसतो. पुन्हा एकदा आपले लहानपणीचे छंद पुरवून घेतले, गोट्या -विटीदांडू- खेळता नाही आले पण नुरा कुस्ती, टेररसवर क्रिकेट अन पळापळ, कॅरम, बुद्धिबळ, अंताक्षरी वगैरे वगैरे सगळं झालं. कराओकेचे  ऍप वापरून ७०-७५ गाणी रेकॉर्ड केली, ८ वर्षे हॉस्टेलवर राहायला असतानाचा बाथरूमी रियाझ कामी आला. :) पोराने एकदा विचारलाच मला, तुम्ही का म्हणता गाणी. 

मुलांचे निरागस प्रश्न कधी कधी चकित करून चक्कीत जाळ करून जातात. मागील आठवड्यातच त्याने मला गुगली टाकला, बाबा जगात सर्वात बुद्धिमान व्यक्ती कोण ओ? मला पटकन काय सुचलंच नाही, बुद्धिमत्ता या लौकिक अर्थाने सांगावे तर कोण आहे सध्या सर्वात बुद्धिमान व्यक्ती, त्याची/तिची बुद्धिमत्ता कोणत्या कसोट्यावर ठरवली गेली असं काहीस मनात येऊन गेलं. उत्तर द्यायचं राहलयं अजून. 

सवयीप्रमाणे काही नवीन पुस्तकं ऑनलाईन खरेदी केली. सगळं काही ऑनलाईन झालयं, गावी न जाता आल्यामुळे गणपती आरती आणि प्रसादसुद्धा ऑनलाईनचं खाल्ला यावर्षी. मित्रांशी भेटणं-बोलणं ऑनलाईन झालं, फक्त हिरव्या हिरव्या डोंगरदऱ्यात फिरताना अंगावर येणारा आल्हाददायक वारा, पाण्याचा खळखळ आवाज ऑनलाईन मिळत नाहीये. 

--मधुमय मृदगंध 
२९ ऑगस्ट २०२०

Sunday 7 June 2020

अनामिक नातं

काही व्यक्ती आपल्याला कधीही न भेटता, त्यांचा सहवास न लाभतातसुद्धा का जवळच्या वाटाव्यात हे एक अनामिक गूढ आहे. मागील आठवड्यात म्हणजे शनिवार ३० मेला रात्री ९:३० ते १०च्या दरम्यान सौंच्या हॉस्पिटलमधील सहकारी, तिची चांगली मैत्रिणीचा व्हाट्सअँप संदेश आला कि, तिचे वडील आजारी आहेत, तिने काही मेडिकल चाचण्या केल्या आहेत त्याचे रिपोर्ट्स तिने व्हाट्सअँपवर पाठवले आहेत, त्यावर तिला सौंकडून सल्ला हवा होता

त्यांच्या चाचण्यामधून स्पष्ट दिसत होतं काही तरी मोठी गडबड आहे शरीरात पांढऱ्या पेशींची संख्या २६,००० झाली आहे आणि त्यामुळे त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये भरती करणे, त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. त्यात तिच्या वडिलांना ह्दयविकार, डायबेटीस या रोगांचा त्रास आहे, त्यामुळे तर पुढील कारवाई त्वरीत होणं अत्यावश्यक होतं. तिचा भाऊ बिचारा, रात्री १:३० वाजेपर्यंत वेगवेगळ्या ९-१० हॉस्पिटलमध्ये वडिलांना दुचाकीवरून घेऊन गेला (अंधेरी पुर्व-पश्चिम उपनगर भाग, ते राहतात घाटकोपरला), आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये फोनवरून विचारणा करत होतो बेड रिकामे आहेत का?? बऱ्याच मित्रांना फोन केला, काही सामाजिक -राजकीय कार्यकर्त्यांना फोन केला, कोरोना चाचणी केल्याशिवाय कुठेही हॉस्पिटलमध्ये भरती करून घेत नाहीत असे सांगण्यात आले.

रूग्णाला ताप आहे हे बघितल्यावर सगळ्या हॉस्पिटलमध्ये हेच सांगण्यात आले, एका हॉस्पिटलने एक्स रे काढण्यासाठी ५,००० रुपये उकळले. ९-१० हॉस्पिटल फिरल्यावरही वडिलांना उपचार मिळत नाहीत म्हटल्यावर, तीचा भाऊ, त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि मित्र हताश होऊन घरी परतले.

संघाच्या एका कार्यकर्त्यांने त्यांना मुंबई महानगरपालिकेमार्फत कोरोना चाचणी करून घेण्यासाठी सर्व माहिती दिली, चाचणीसाठी नंबर लावला. २४ तासानंतर म्हणजे १ जुनला त्या रूग्णांची चाचणी झाली, जी कोरोना पॉझिटिव्ह आली, हे समजलं २ जुनला आणि त्यादिवशी संध्याकाळी त्यांना अंधेरीच्या सेवन हिल्स या इस्पितळात ICU बेड मिळाला. आम्हा सगळ्यांना वाटलं चला, उपचार तरी चालू झाले. पण खरी लढाई आता होती, आतापर्यंत बेड मिळवण्यासाठी हातघाईची, लुटुपुटीची लढाई होती.

कोरोना रूग्ण, हॉस्पिटलमध्ये ऐकटेच असतात. घरातील व्यक्ती बरोबर नसतात, ना कोणी मित्र-नातेवाईक भेटायला येऊ शकतात. सगळ्याला मनाई आहे, त्यात जर रूग्ण ज्येष्ठ नागरिक असेल तर, ते ऐकटेच असल्याने, आजुबाजुला असलेली परिस्थिती बघून आणखी निराश, हतबल भावनांनी घेरले जातात. त्याच्यांशी फक्त फोनवरून बोलणं होतं. तिथली परिस्थिती फक्त फोनवरून समजते, प्रत्यक्ष डोळ्याने काही बघता येत नाही. अशा वेळी त्या रूग्णांची मानसिक स्थिती, त्यांच्या कुंटुबातील लोकांची अवस्था काय असेल याचा विचार करून अंगावर शहारेच येतील.

काल रविवार ७ जुन, दुपारी बातमी आली की ते काका आपल्याला सोडून गेले. गेल्या आठवड्यातील या अनुभवाने खुप अंतर्मुख केलं आहे मित्रांनो, का कुणास ठाऊक, त्या देसाई काकांबद्दल मनात ऐव्हढी सहानुभूतीदायक हळहळ का निर्माण झाली. ज्यांना कधी मी, माझी बायको भेटलो नाही, बघितलं नाही, ही बातमी समजल्यावर मनात अस धस्स झालं.. जवळचच कोणी तरी सोडून गेलं आहे असं वाटत राहिलं.

कदाचित, मनात भितीने शिरकाव केला आहे. सौची मैत्रीण, स्वतःच्या जन्मदात्या वडिलांच्या वैकुंठ प्रवासाच्या कार्यास जाऊ शकली नाही. तिच्या भावाने, एकट्यानेच ते कार्य उरकले. कसं वाटलं असेल त्याला; एकट्याने त्या स्मशानात, वडिलांचे निर्जीव शरीर शेवटचं न्याहळताना, पार्थिवाला अग्नी देताना. विचार करवत नाही, मती गुंग होते ...

हे सगळं लिहिण्याचं कारण, कदाचित आपण आपल्या आयुष्य खुपच ग्रहीत धरतो. सगळं ठीक आहे, होईल, सरकार हळूहळू पुर्वीप्रमाणे सगळ्या गोष्टी करण्यासाठी मिशन बिगीन अगेन वगैरे राबवत आहे, पण काळजी घेणं खुप खुप गरजेचं आहे.

खासकरुन ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं, त्यांना प्रवास करू देऊ नका, सकाळी -पहाटे फिरायला जाताना शक्य तितकी प्रतिबंधकात्मक काळजी घ्या. उषःकाल होईल जेव्हा केव्हा व्हायचा तेव्हा, तो बघण्यासाठी स्वतः ची काळजी घ्या.

- मृदगंध ७ जुन