Thursday 13 June 2019

मनसोक्त

माळरानावर उनाड बागडून,
गवताच्या पात्याचें बाण मारून,
झाडांना हाताने -पायाने स्पर्श करून,
खूप दिवस झाले

गावातील जुन्या विहिरीत सूर मारून,
शाळेच्या मैदानातील गुलमोहर पाहून,
चटका मारणाऱ्या उन्हात फिरून,
खूप खूप दिवस झाले

गल्लीतील पोरांबरोबर हाफ पीच खेळून,
गटारीत गेलेला बॉल दोन बोटात उचलून,
भर दुपारी पळत येत; थंड पाणी पिऊन,
खूप खूप खूप .. दिवस झाले

उन्हाळाच्या सुट्टीत आवळे, चिंचा
कैऱ्या, जांभळं पाडून,
कावडीला नाही तर सायकलला घागरी बांधून,
खूप, खूप, खूप ..म्हणजे खूपच दिवस झाले

स्लो सायकलची रेस लावून,
चिखलात हात बरबटून अन किल्ला बांधून,
कोण पाणी उंच उडवत; विहिरीत गट्टा ऊडी मारून,
खूप, खूप, खूप ... खुप्पच दिवस झाले

थोडक्यात काय, मनसोक्त जगून...
खुप दिवस झाले

- मधुमय मृदगंध, १४/०६/२०१९

Monday 3 June 2019

#आपण काय मिळवलं ?? - #शोध #चालू #आहे
सर, तुमच्यासारखं सर्वस्पर्शी, संपुर्ण विषयांना कवेत घेऊन, लिहणं जमणार नाही. तरीसुद्धा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय, काही चुकीचे संदर्भ वाटले किंवा त्रोटक असं वाटलं तर आपण ते समजून घ्याल अशी खात्री आहे आणि म्हणूनच हे धाडस केलं आहे.
https://www.facebook.com/rajendra.parijat/posts/10214740630814163 )
माहितीचा आणि अभिव्यक्तीचा महास्फोट मोबाईल या माधम्ययंत्राद्वारे गेल्या दशकभरमध्ये झाला आहे. इंटरनेटचा प्रसार जितक्या वेगाने होत आहे तेवढ्याच पटीत या स्फोटाची व्याप्ती वाढत आहे. या माहिती -अभिव्यक्तीच्या समुद्रमंथानाच्या स्फोटातून बाहेर पडलेली रत्न आहेत, अमृतही आहे तसेच विषसुद्धा आहे. ग्रामीण भागात गावोगावी असलेल्या झेंडा किंवा गांधी चौकातील पार असो किंवा शहरा -शहरात असलेल्या जुन्या गल्लीतील कट्टे असोत, या इंटरनेट - माहितीच्या प्रसाराच्या वेगवान जंजाळात प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, समाज, जाती समुह, जिल्हा - राज्य आणि देश पातळी, अश्या वेगवेगळ्या स्तरावर आपण व्यक्त होत आहोत. मनात असलेले सर्व काही share -like आणि कंमेंटीत आहोत, एकमेकांवरचे प्रेम -द्वेष- राग जोरजोरात सांगत आहोत, मांडत आहोत कारण यातून होणाऱ्या परिणामांची चिंता करायला सवड कोणाला आहे.
सवड असलीच तर ती अश्या लोकांना आहे ज्यांचे या सर्वातून होणारे परिणाम आणि त्यातून प्रवाहित होणारे बदल, हे बदल व्यक्ती, कुटुंब, समाज, जाती समुह, जिल्हा - राज्य आणि देश पातळीअसा स्तरावर आहेत आणि विचारांच्या आदान प्रदानातून मतपरिवर्तन होतं आहे. याचे परिणाम स्वरूप आपल्याला नको असलेली सगळी बाहेर येत आहे, यापूर्वी माहित नसलेली किंवा काही उपलब्ध नसलेली अशी माहिती, मग ती माहिती खेळ, इतिहास, भाषा, विज्ञान, मनोरंजन, अर्थ, बाजारपेठा ते पोर्नग्राफी अशी सर्वसमावेशी आहे.
१०-१२ हजार लोकसंख्येच्या गावात, ज्या ठिकाणी शालेय मुला-मुलींसाठी वर्षोनवर्षे ग्रंथालय बांधण्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावतीरिक्त फारसं काही झालं नाही. अवांतर वाचनाची आवड लागेल असं काही शाळेत उपक्रम नाहीत, पालकांना पोरांनी मार्क किती मिळवलेत याच्यापेक्षा जास्त जाणून घेण्यात रस नाही. मग अशी एक आख्खी पिढी, जी अचानक या माहितीच्या - अभिव्यक्त होण्याच्या स्पर्धेत येते. मोकळं रान मिळाल्यावर, कानात वार भरल्यासारखं मग ते शिंगरु उधळलं कि गप्प बसल. २००० साला नंतर ग्रामीण भागातून पदवी -पदवीत्तर शिक्षण घेऊन नोकरीसाठी स्थलातरीत झालेली अशी लाखों मुलं -मुली आप -आपली दिशा चाचपडत, ठेचखाळत शोधत निघाली, आपल्या गावातून बाहेर पडली आहेत. हि मंडळी आहेत ज्यातील काहींनी परदेश वाऱ्या केल्या आहेत, तिथलं मोकळी -ढाकळी संस्क्रुती, न्याहारीलाही बिअर ढोसुन ऑफिसला येणारे सहकारी बघितली आहेत आणि ही मंडळी जेंव्हा परत येतात तेंव्हा, याचे अनुकरण-प्रदर्शन ज्यांनी परदेश वारी केली नाही, करायची संधी मिळाली नाही त्यांच्यासमोर करतात, त्यात आता तडका मिळाला आहे टिक-टॉक, FB, youtube यासारख्या माध्यमांचा.
आपल्या लोकसंख्येतील मोठा गट हा २५-३५ वयोगटातील आहे, ज्यांची क्रयशक्ती सध्या त्यांच्या जीवनाच्या आलेखात सर्वोच्च पातळीवर आहे आणि त्याद्वारे मिळणारे अर्थार्जनसुद्धा काहींचे तेव्हढेच भक्कम आहे तर बहुतांश जणांचे सर्वसाधारण पातळीच्या वर आहे. यांचा जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात आमूलाग्र बदल झाला आहे, ते बघतात ती चित्रपट-मालिका-नाटकं, ती वाचत असलेली पुस्तकं/e -पुस्तकं आहेत. हे सर्व ज्या साधनाच्याद्वारे त्यांच्यापर्यंत पोहचत ती सर्व व्यक्तीकेंद्रित आहेत. कोठेही सामूहिक वाचन, कीर्तन किंवा संवाद, विवेचन असा नाहीये. Aspirational change - आकांक्षा बदलल्या आहेत आणि त्या कश्या साध्य होतील, कोणत्या पद्धतीच्या धोरणात्मक चौकटीत मिळवता येतील, त्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे, काय करावे किंवा करू नये, हे ती पिढी आप-आपल्या पातळीवर एकमेकांशी चर्चा -भांडण करत ठरवत आहे.
गांधीजी, सावरकर, नेहरू, सरदार पटेल, डॉ आंबेडकर यांची ओळख झाली ती शाळेतील इतिहासात आणि आता चालू असलेल्या राजकीय -सामाजिक संघर्षात ती परत वाचली जात आहेत. शाळेत शिकवलेला इतिहासचं खरा अशी समजूत होती, ती पूर्णपणे ध्वस्थ झाली आहे. काही नेत्यांनी तर त्या त्या समाजाचे नेतृत्व करणारे लोक/नेते त्यांच्या समाज्याच्या कोंदणात बंदिस्थ करून टाकले आहे. तुलनात्मक इतिहास, इतिहासातील संदर्भ जे आजपर्यंत गावोगावी पोहचत नव्हते, ते आता एक फॉरवर्ड वर तासाभरात देशभर पोहचत आहेत किंवा पोहचवले जातातं. त्याची शहानिशा करावी, संदर्भ खरा -खोटा पडताळणी करावी याची कोणाला गरज भासत नाही - कारण व्यक्त व्हायचं आहे, व्यक्त होण्याची अदृश्य अशी स्पर्धा आहे. यासाठी समाज माध्यमांना दोष देऊन चालणार नाही. शाळेत असताना निबंध लेखनाचा प्रश्न असायचा - TV शाप कि वरदान?? विज्ञान - शाप कि वरदान? वगैरे विषय दिले जायचे आणि नवनीत अपेक्षित मध्ये याची ठोकळ उत्तरदेखील असायची जी आम्ही पोरं रट्टा मारून लिहायचो.
अवांतर वाचन नाही, संदर्भ तपासून त्याद्वारे नवीन विचार निर्माण करून काही नाविन्यपूर्ण लिहावं अशी सवय नाही. बदलेल्या आकांक्षा, राजकीय -सामाजिक संघर्ष त्याला आरक्षणाची फोडणी मग इतिहासाची मोडतोड आणि स्वस्तातील इंटरनेट-मोबाईल यंत्र त्याला जोड आहे माहितीचा महास्फोट, अभिव्यक्त होण्याची चढाओढ - या सगळ्या गदारोळात नागरिक शास्त्र जे शाळेतच मुळात २० गुणांसाठी होते, जे त्याच वेळी ऑप्शनला पडले ते आता कोण गांभीर्याने वाचून -समजून -उमजून घेईल.
कोणी घेतलेच ते समझून - #कर्त्यव्य#हक्क#सामाजिक -#कौटुंबिक #मूल्य ( मूल्य शिक्षण पण ऑप्शनला बर का?) तर ते सांगितले गेले पाहिजे अश्या व्यासपीठावर ज्या ठिकाणी ही जनता ते बघायला - ऐकायला हजर असेल.